चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणुक केल्याबद्दल व शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शेतकरी संघटना सुकाणु समिती, चांदुर रेल्वेच्या वतीने शुक्रवार बलीप्रतिपदेच्या दिवशी लेखी तक्रार ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्याकडे केली असुन या तक्रारीवरुन गुन्हे नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलीस तक्रारीत नमुद केल्याप्रमाने सरकारने निवडणुकीमध्ये वचन दिले होते की, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करू तसेच डॉ. एम. एस. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाने सर्व शेतीमालाचे बाजार भाव उत्पादन खर्च व 50% नफा ठरवु आणि शासकीय खरेदी करू. परंतु गेल्या तीन वर्षापासुन भाजप सरकारने याबाबत कोणतीही कृती केली नाही. याउलट त्यांनी ते नाकारले. त्याचा थेट परीणाम म्हणुन शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये सातत्य कायम राहुन वाढ झाली आहे. या आत्महत्यांना मुख्यमंत्री जबाबदार असुन त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. तसेच याच महिन्यात यवतमाळसह इतर जिल्ह्यात किटकनाशक औषधांची फवारणी दरम्यान शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे प्राण गेले. त्याबाबत कंपन्याची उत्पादने तपासली नाही व त्यांना थांबविले सुध्दा। नाही, प्रमाणित केलेले नाही. तरीही खुल्या बाजारात किटकनाशक औषधी आली. याबबतही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्राणहाणीला मुख्यमंत्रीच जबाबदार आहे. त्यामुळे या मुद्द्यांची दखल घेऊन न्यायाच्या दृष्टीने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूध्द आय. पी. सी. कलम 3ड2 (खुन), 306 (आत्महत्येस प्रवृत्त करने) व 402 (फसवणुक) दाखल करून खटला भरावा अशी मागणी शेतकरी संघटनांच्या सुकाणु समितीच्या वतीने ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांना दिलेल्या लेखी तक्रारीतुन केली आहे. तत्पुर्वी शुक्रवारी सुकाणु समिती, चांदुर रेल्वेचे सर्व सदस्य तसेच शेतकरीवर्ग सिनेमा चौकात जमा होऊन गावातुन मिरवणुक काढुन पोलीस स्टेशनसमोर आले होते. लेखी तक्रार दाखल केल्यानंतर यावेळी एक छोटेखानी सभेचे पोलीस स्टेशनसमोरच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॉ. देविदास राऊत, कॉ. विनोद जोशी, नितीन गवळी, विलासराव आसोले, कॉ. प्रफुल ढगे यांची भाषणे झाली. यासभेचे प्रास्ताविक कॉ. विजय रोडगे यांनी तर संचलन कॉ. सागर दुर्योधन यांनी केले.
यावेळी किसान सभेचे अध्यक्ष कॉ. देविदास राऊत, भाकपाचे कॉ. विनोद जोशी, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विलासराव आसोले, कॉ. प्रफुल ढगे, कॉ. विजय रोडगे, कॉ. सागर दुर्योधन यांच्यासह महेमुद हुसेन, राजाभाऊ भैसे, प्रहार शेतकरी संघटनेचे सौरभ इंगळे, भिमराव खलाटे, अरविंद भैसे, भिमराव बेराड, विनोद लहाने, प्रभाकरराव कडु, गजानन भैसे, पंकज गुडधे, प्रभुराज इंगळे, प्रफुल बनसोड, कॉ. गणेश तुमरे, सचिन इमले, कॉ. भिमराव दांडेकर, विक्रम तायडे, कॉ. कृष्णकुमार पाटील, मनोज जिरापुरे, संतोष मेश्राम, प्रमोद झाडे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.