चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकर्यांचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदानाचे प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल केल्यानंतरही मागील दोन वर्षांपासुन २ कोटी ५३ लाख रुपये अनुदानाच्या प्रतिक्षेत शेतकरी असल्याची बाब समोर आली.
शासनाच्या कृषीमंत्र्यांनी ठिबक सिंचन अनुदानाच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतरही ठिबक अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शासनाची ठिबक अनुदानाची घोषणा हवेतच विरली असल्याची प्रतिक्रीया शेतकर्यांकडून होत आहे. सन २०१४-१५ वर्षात १ कोटी ३५ लाख ४७ हजाराचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील ३९ लाख ३५ हजार रूपये शेतकरी वर्गाला देण्यात आले. २०१५- १६ कालावधीत ६६४ शेतकर्यांनी १ कोटी ७४ लाखाचा अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. त्यापैकी १९ लाख २० रूपयाचे अनुदान शेतकर्याला वितरीत करण्यात आले. अजूनही दोन वर्षापासून २ कोटी ५३ लाख रुपयाचे ठिबक योजनेचे अनुदान प्रलंबित आहे. राज्यात विदर्भाचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री असतांना शेतकर्यांचे एकट्या चांदूर रेल्वे तालुक्याचे २ कोटी ५३ लाख रुपये प्रलंबित कसे, असा या प्रश्नाची शेतकरी वर्ग चर्चा करीत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ठिबक संच उधारीवर तर काहींनी बँकांचे कर्ज काढुन बसविले. याबाबतची तपासणी व चौकशी कृषी विभागाकडुन करण्यात आली. तरीही अनुदानाची एवढी प्रतिक्षा कशासाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.