अमरावती :-
मतदानापासून कुणीही वंचित राहू नये व बोगस मतदान होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील 2543 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघर भेटी देऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत.
या कार्यक्रमाची आज सुरुवात झाली. तो 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल. जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाकडून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदार यादीतील कुटुंब सदस्यांची संख्या, मयत मतदार, स्थलांतरित सदस्य, पात्र मतदार पण यादीत नाव नसलेले मतदार, तसेच दि. 1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर पात्र होणारे मतदार किती, मतदार यादीत नाव असलेले पण परदेशात असलेले मतदार आदी माहिती गोळा करण्यात येणार आहे. मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करुन माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री अभिजित बांगर यांनी केले आहे.