मेहुणबारे ता. चाळीसगाव: – काही दिवसांपूर्वी आडगाव (ता. चाळीसगाव) येथे ज्या विहिरीत पडून वडिलांचा मृत्यू झाला, आज (मंगळवार) मुलासह आईचा त्याच विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आडगाव शिवारात दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. याामुुळे परिसर सुन्न झाला आहे.
मेहुणबारे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील आशाबाई राजेंद्र पाटील (वय 35) व मुलगा गौरेश राजेंद्र पाटील (वय 11) हे दोघे स्वतःच्या शेतात गेले होते. आज दुपारी साडे तीनच्या सुमारास मुलगा गौरेश बोर खाण्यासाठी बोराच्या झाडाकडे गेला होता.
बोराच्या झाडाजवळच विहीर आहे. त्या दरम्यान तो विहिरीत पडला. हे आई आशाबाई यांच्या लक्षात आले असता, त्यांनी विहिरी जवळ जाऊन पाहिले व त्याही विहिरीत पडल्या. विहीर खोल असल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.काही दिवसांपूर्वी त्याच विहिरीत मुलाचे वडील राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नजीम शेख हे उपस्थित होते.