आमदारांनी एसपींना केले होते लक्ष
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
चांदूर रेल्वे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अनेक महिण्यांपासून ढेपाळली होती. अवैध धंदे शहरासह तालुक्यात जोमात सुरू असतांना चांदूर रेल्वेचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी ही बाब विधानसभेत मांडली होती. विधानसभेत लक्षवेधी होताच ग्रामिण पोलीस विभाग खडबळून जागा झाला असून कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. आमदारांनी या लक्षवेधीमध्ये ग्रामिण पोलीस अधिक्षकांना लक्ष करून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला होता.
तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय वाईट झाली होती. पोलीस अधिकारीवर्ग लक्ष द्यायला तयार नसतांना आमदार वीरेंद्र जगताप यांनी यामध्ये लक्ष घातले. अवैध धंद्यांचा संपुर्ण अभ्यास करून आपल्या शैलीत अतिशय तीक्ष्णपणे काही दिवसांपुर्वी नागपुर येथील पावसाळी विधानसभेत आ. जगताप यांनी लक्षवेधी मांडली होती. यामध्ये त्यांनी अवैध दारू तालुक्यात खुलेआमपणे सुरू असून या अवैध दारूमुळे शहरातील दोन पोलीसांवर जीवघेना हल्ला झाल्याचे लक्षात आणून दिले. यामध्ये एका पोलीसाला जीव सुध्दा गमवावा लागला. यानंतर अवैध प्रवासी वाहतुक जोमात सुरू असल्याचे सांगितले. एस. टी. भाड्यात १८ टक्के भाडेवाढ झाल्याने एसटी ने प्रवास करणारे कमी झाले असून अवैध प्रवासी वाहतुकीत अजुन वाढ झाली आहे. रस्त्यावर समोर काळी पिवळी गाडी, मागे प्रवासी व्हॅन व त्याच्यामागे भंगार खाली एसटी बस असे चित्र तालुक्यात असल्याचे आ. जगताप यांनी विधानसभेत म्हटले होते. अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याची हिंम्मत करीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबत ग्रामिण पोलीस अधिक्षक यांना लक्ष करीत ते हिंमतवाले आहे असे म्हणत असल्याचे सांगितले. मात्र त्यांना केवळ आमदारांच्या मागे लागायला वेळ असून अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम लावण्यासाठी वेळ नसल्याचे आ. जगताप यांनी म्हटले होते. तसेच शहरासह तालुक्यात दारू, सट्टा, जुगार, गांजा असे अवैध धंदे सुरू असल्याचे विधानसभा अध्यक्षांना सांगितले. याशिवाय पोलीसांच्या बदलीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप केला.
आ. जगताप यांच्या या लक्षवेधी नंतर चांदूर रेल्वेसह अमरावती ग्रामिण पोलीस विभाग कामाला लागले आहे. पोलीस विभागातर्फे अवैध प्रवासी वाहतुकदारांवर धडाक्यात सुरू असल्याचे चित्र आहे. याशिवाय शहरातील अवैध दारू, सट्टा, जुगार या अवैध धंद्यांवर धाडीचा सपाटासुध्दा पोलीसांनी सुरू आहे. एकुणच म्हणजे आ. जगताप यांच्या एकाच लक्षवेधीमुळे काही प्रमाणात तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ठिक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही सुव्यवस्था अशीच कायम राहणार की पुन्हा ‘जैसे थे’ होणार हे येणारा काळच सांगेल.
मध्यप्रदेश पोलीस महाराष्ट्रात येऊन गांजा पकडतात
याच दरम्यान आ. जगताप यांनी मध्यप्रदेश पोलीस महाराष्ट्रात येऊन गांजा तस्करी पकडत असल्याचा प्रश्न उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. काही महिण्यांपुर्वी चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथे मध्यप्रदेश पोलीस येऊन एका गांजा तस्कर महिलेला अटक केली होती व गांजा तस्करीचा भांडाफोड केला होता. ऐवढी मोठी तस्करी अमरावती जिल्ह्यातून होत असतांना महाराष्ट्रातील व खास करून अमरावतीच्या पोलीसांना अवैध गांजा तस्करी का सापडू शकत नाही ? असा प्रश्न आ. जगताप यांनी अध्यक्ष महोदयांसमोर विधानसभेत उपस्थित केला.