खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांची भेट
नांदेड- बेंगलोर गाडीला घाटनांदुर येथे थांबा, नांदेड – पनवेल गाडी लवकर सोडा आदी मागण्यांचे दिले निवेदन
परळी वैजनाथ दि. 8 .
बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांची भेट घेऊन परळी – बीड – अहमदनगर रेल्वे मार्गाचे कामाबद्दल चर्चा केली. यावेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी नांदेड – बेंगलोर गाडीला घाटनांदुर येथे थांबा, नांदेड – पनवेल गाडी लवकर सोडणे आदी मागण्यांचे निवेदन सादर केले. ना. गोयल यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
नांदेड – बेंगलोर एक्स्प्रेस गाडीला घाटनांदुर येथे थांबा नाही. व्यापार, दर्शन आणि ईतर कामासाठी प्रवास करणारांची संख्या मोठी आहे. त्यांना या गाडीत बसण्यासाठी परळी वैजनाथला जावे लागते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच वेळ आणि आर्थिक भुर्दंड बसत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड – बेंगलोर गाडीला घाटनांदुर येथे थांबा द्यावा, नांदेड – पनवेल ही गाडी पनवेल येथे सकाळी 9 वाजता पोहोचते, तेथून मुंबईला जाण्यासाठी तीन – चार तास लागतात. त्यामुळे व्यापारी, नागरीक यांची मुंबईतील कामे आटोपून परत येणे शक्य होत नाही. त्यामुळे बर्याचदा मुक्काम करावा लागतो. हीच गाडी सकाळी 6 वाजता पनवेल येथे पोहोचली तर सर्व व्यवहार सुरळीत होतील. त्यामुळे या गाडीच्या वेळेत बदल करावा, तसेच मछलीपट्टनम – बिदर ही गाडी बिदर येथे तब्बल दहा तास थांबुन असते या ही गाडी परळीपर्यंत सोडून प्रवाशांची सोय करावी आदी मागण्यांबाबत खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी ना. गोयल यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले. या सर्व मागण्यांबाबत आपण सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असे आश्वासन ना. गोयल यांनी दिले.
दरम्यान परळी – बीड – अहमदनगर या गाडीला बीड येथे बार्शी रोडला रेल्वे स्टेशन करायचे की थांबा द्यायचा याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी रेल्वेच्या उच्च अधिकार्यांचे शिष्टमंडळ लवकरच बीडला भेट देणार आहे. हे शिष्टमंडळ आपला अहवाल दहा दिवसांत सादर करणार असून नंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे ना. पियुष गोयल यांनी सांगितले.