सर्वात पवित्र तीर्थ म्हणजे ज्ञान – इंजि. पवन दवंडे
बेलोना येथील बाल हनुमान रथ यात्रा महोत्सवात गरजली सप्तखंजरी !
विशेष प्रतिनिधी /
नागपूर जिल्ह्यातील सर्वांचे श्रद्धास्थान बेलोना येथील बाळ हनुमान रथ यात्रा महोत्सवात हजारो भक्तांच्या उपस्थितीत इंजि. पवन दवंडे यांनी आपल्या खंजरीच्या माध्यमातून हजारो भक्तांना प्रबोधन करतांना म्हणाले की जगातील सर्वात पवित्र तीर्थ म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाने माणसाचे मन शुद्घ होते ज्याचे मन शुद्ध तोच बुद्ध होतो. असे प्रतिपादन इंजि. पवन महाराज दवंडे यांनी बेलोना येथे आपल्या सप्तखंजरी प्रबोधनातुन केले. माणसाला माणसात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय दूसरा मार्ग नाही. शिक्षणाने माणसाचा मन, मस्तक आणि मेंदू साबुत असतो म्हणुन प्रत्येक माणसाने आज ज्ञान रूपी तीर्थ प्राशन करा असे आवाहन पवन दवंडे महाराजांनी आपल्या प्रबोधनातून व्यक्त केले. तसेच बजरंगबली हे शक्ती आणि भक्ती चे दैवत आहे. या संपुर्ण भारत देशात असे एकही गाव नाही जिथे हनुमंताचे मंदीर नाही हमुमानजी हे शक्ती चे उपासक आहे म्हणुन गावातील तरुण मुलांनी हनुमंताचा आदर्श घेऊन बलवान बनावे आणि आपल्या गावाला आदर्श करावे असे प्रतिपादन इंजि. दवंडे महाराजांनी आपल्या प्रबोधनातुन केले.
बाल हनुमान रथ यात्रा महोत्सव आणि ग्रामगीता तत्वचिंतन कार्यक्रमाच्या माध्यमातून इंजि. पवन महाराज दवंडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या सप्तखंजरी मनोरंजनात्मक कीर्तनातून इंजि. पवन दवंडे महाराजांनी अनेक सामाजिक विषयाला स्पर्श केला ज्यात हुंडाबळी, स्त्रिभ्रूणहत्या, हानगदारीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, शेतकरी आत्महत्या व कर्जमाफी, पानी अडवा पानी जिरवा आदि विषयांवर दवंडे महाराजांनी आपल्या बहारदार गितांच्या आणि सप्तखंजरी वादनाच्या माध्यमातून उपस्तित लोकांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनात साथसंगत म्हणुन डॉ. योगिराज राघोर्ते, मिथुन कविटकर, सतिश इंगोले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सूत्रसंचालन संदीप मेंढे तर आभार प्रदर्शन प्रमोदसिंग राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन माजी मंत्री अनिलजी देशमुख आणि समस्त बेलोना वासियांनी केले.