शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात !
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे जागतिक संत्रा महोत्सवाकडे लक्ष !
संत्रा उत्पादकांना आश्वासनांचा सुकाळ , संत्रा प्रकल्पांचा दुष्काळ !
कधी सुटणार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या ?
रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /
विदर्भाच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या कमी हितांना दिसत नाही . विदर्भात संत्रा पिकावर अवलंबून असणारे सुमारे सव्वा लाख कुटुंब असून त्यांचा उदरनिर्वाह सामाजिक व आर्थिक परिस्तिथी संत्रा पिकावर अवलंबून आहे. परंतु मागील आठ ते दहा वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांकडून अनेक निवेदन देण्यात आले पण त्याचा फायदा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होतांना दिसत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे .
अमरावती नागपूर जिल्ह्यात संत्रा उत्पादकांची मोठी संख्या असून हजारो हेक्टर जमिनीवर संत्रापीक घेतले जाते. यामध्ये मृग आणि आंबिया असे दोन बहर घेतली जाते. परंतु प्रक्रिया होत नसल्याने आणि परप्रांतीय बाजारपेठेत मागणी नसल्याने संत्रा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ संत्रा उत्पादकावर येत आहे. कमी भावातही व्यापारी संत्रा खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांपुढे सुलतानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च काढणेही दुरापास्त झाले. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर कर्जाचा भार वाढत असल्याने शासनाने संत्रा प्रकल्प उभे करून संत्र्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
राज्यातून केवळ विदर्भात संत्राचे उत्पादन घेतल्या जाते. मोर्शी , वरुड, अचलपूर , चांदुर बाजार , नरखेड , काटोल तालुक्यात संत्रा लागवडीखाली हजारो हेक्टर शेतजमीन संत्रा पिकाखाली आहे. गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि दुष्काळामुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आंबिया बहराची संत्री होती . पण प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादकांना अखेरची घरघर लागली आहे. परप्रांतिय बाजारपेठेत भाव गडगडल्याने सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्र्याला अत्यल्प भाव मिळत आहे. मध्य प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्च बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने लागलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.
राज्य आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्याकडून कृषिमालमाध्ये ज्वारी, तूर, कापूस, ऊस, यासह आदी पिकांना शासनाकडून हमीभावाने खरेदी केली जाते. याच धर्तीवर संत्रासुध्दा हमीभावाने राज्य शासनाने खरेदी करून वायनरी, रस प्रक्रिया केंद्र तसेच आदी उत्पादनामध्ये वापर केल्यास बहुगुणी संत्राला चांगले दिवस येतील, अशी संत्रा उत्पादकांची अपेक्षा आहे.
देशातील विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीसुध्दा हमीभावाने संत्रा खरेदी केल्यास संत्र्यापासून तयार होणारी विविध खाद्यपदार्थ तयार केल्यास याचा लाभ शेतकरी तसेच व्यावसायिकांना होऊ शकते. थेट विक्रीला महत्त्व प्राप्त झाल्यास अधिक भाव मिळण्यास सुरुवात होईल. याकडे शासनाने कधीही लक्ष केंद्रित केले नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी त्यापासून वंचित राहिला . देशात दारू, बियर, औषधी, आयुर्वेदिक औषधी तसेच भांडी, कपडे धुण्याची डिटर्जेंट पावडर, शितपेये आदींमध्ये संत्र्याचा वापर वाढल्यास पुन्हा संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील अशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मात्र तसे होतांना दिसत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे .
मुख्यमंत्री साहेब संत्रा उत्पादकांनी समस्या मांडाव्या तरी कुणाकडे ?
यावर्षी पावसाने पाठ दाखविल्याने संत्रा उत्पादक पूर्णपणे अडचणीत आले आहे. संत्र्याला मिळणारा दर फारच अल्प असून त्यातून उत्पादन खर्च भरून निघत नाही. व भीषण दुष्काळामुळे आपली हजारो संत्रा झाडे जगविण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकरी तारेवरची कसरत करतांना दिसत आहे , मात्र शासनाकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याच सवलती मिळत नसल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहेत. त्यांचे प्रश्न शासनाने सोडवावे अशी मागणी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाकडे अनेक वर्षांपासून केली जात आहे मात्र त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता न्याय मागावा तरी कुणाकडे असा प्रश्न संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाना पडला असून शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे असे चित्र पाहायला मिळत आहे .
या आहेत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या !
संत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाची वृद्धी करण्यात यावी.
दर्जेदार संत्रा उत्पन्न करण्यासाठी संत्राचा सुधारित जाती निर्माण करण्यात याव्या,
संत्रा निर्यातीकरिता आवश्यक त्या सोई सुविधा निर्माण करण्यात याव्या,
बांगलादेशमध्ये सर्वात जास्त नागपुरी संत्रा निर्यात होतो त्याकरिता पणन महामंडळाचे कार्यालय बांगलादेशमध्ये सुरू करावे,
सार्क देशामध्ये संत्रा निर्यातीकरिता प्रयत्न करावे,
संत्रा ज्यूस प्रक्रिया कारखाने निर्माण करण्यात यावे,
एन आर सी सी नागपूर येथे संत्राची आदर्श संत्रा बाग निर्माण करावी ,
चांगल्या प्रकारच्या जातिवंत संत्रा कलमा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात याव्या.
एन आर सी सी तर्फे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे.
संत्राचा खप वाढविण्याच्या दृष्टीने संत्राचे आहारातील महत्व व पोषण मूल्य जनतेसमोर आणून जनजागृती करणे ,
उत्पादक ते ग्राहक संत्रा विक्री करून जनजागृती करणे,
प्रदर्शन, चर्चासत्र, माहिती फलक, इत्यादी बाबींसाठी जाहिरात व उपभोक्ता जनजागृती अभियान राबवने.
दूरदर्शन व आकाशवाणी द्वारे संत्राची जाहिरात करावी, तसेच संत्राचा खप वाढविण्यासाठी संत्रा ज्यूस चा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा,
एस टी स्टँड व रेल्वे स्टेशनला संत्रा विक्रीसाठी, संत्रा ज्यूस पार्लरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासह विविध मागण्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे केल्या आहे .