Amravati:-
जिल्हा परिषदेची कोणताही शाळा विनाशिक्षक राहणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्याचे आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले आहे. शाळांमध्ये वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये वीज पुरवठा नसल्याने शैक्षणिक कार्यक्रमात व्यत्यय, तसेच शिक्षकांअभावी अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. शाळाखोल्यांची स्थिती व वीजपुरवठा, थकित देयकांबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून आढावा मार्च-एप्रिल या कालावधीत घेण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक मतदान केंद्रांच्या उपयोगासाठी असलेल्या शाळा, तसेच थकित देयकाअभावी वीजपुरवठा खंडित झालेल्या शाळा यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी स्तरावरील उपलब्ध निधीमधून ही देयके देण्याबाबत निर्देशही देण्यात आले, असे श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.
ज्या शाळेतून शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तिथे शिक्षकांची पर्यायी व्यवस्था गट शिक्षणाधिका-यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एकही शाळा विनाशिक्षक राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.