मुंबई:-
अमरावती येथील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापठाची स्थापना करण्यासाठी एका आठवड्यात समिती गठीत करा, असे निर्देश कृषिमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिले.
मंत्रालयात आज रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव धकाते, अखिल भारतीय महानुभाव महामंडळाच्या अध्यक्षा अॅड तृप्ती बोरकुटे, उपाध्यक्ष रमेश आमदारे, महासचिव उमेश ठाकरे त्याचबरोबर उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री डॉ बोंडे म्हणाले, रिद्धपुरमध्ये मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठीत केलेली समिती रिद्धपुर येथे भेट देऊन उपलब्ध जागा व मान्यतेसाठी आवश्यक इतर बाबींची पूर्तता करून अहवाल सादर करणार आहे. मागील वर्षी उच्च तंत्र शिक्षण सचिव स्तरीय समितीने रिद्धपुरमध्ये भेट देऊन अहवाल तयार केला होता. त्या समितीचा प्राप्त अहवाल ग्राह्य धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मराठी विद्यापीठ स्थापनेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.