रेतीतस्करांनी चांदुर बाजार तालुक्यातील अनेक मार्गाची लावली वाट,खडेमय रस्त्यावर प्रशासन चे दुर्लक्ष
प्रतिनिधी:-
चांदुर बाजार तालुक्यातील काजळी ते माधान,जसापूर ते कोदोरी,ब्राह्मण वाडा ते चांदुर बाजार, कुरळपरणा ते तळवेल या मार्गाची रेती चोरट्यांनी चांगलीच वाट लावली. परिणामी, पूर्ण मार्ग फुटल्याने जागोजागी खड्डे पडल्याने येणार्या-जाणार्या नागरिकांना वाहन चालवताना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याने रेती तस्करांना आवर घालणार का कोणी? असा स्थानिकांचा सवाल आहे.
वरील मार्ग हे प्रमुख असून या मार्गावरून दररोज शाळेत येणारे विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, शेतमजूर वर्ग यांची ये-जा असते. परंतु, मार्गावर खड्डे पडलेले असल्याने मार्गावरील डांबर उखडून सर्वत्र गिट्टी पसरलेली आहे. यामुळे हा मार्ग जीवघेणा ठरत असून, मार्गाचा वाली कोण? असा सवाल नागरिकांना पडला आहे. या मार्गावरून दररोज रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू असतो. त्याचबरोबर रात्रीलासुद्धा ट्रॅक्टर, ट्रक या मार्गाने रेती भरून जात असल्याने जड वाहनामुळे मार्ग उखडला आहे. प्रसासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शंका उपस्थित होत आहे.
तालुक्यातील अनेक भागात नदीपात्र जवळच आहे. याच नदी पात्रातुन रेतीची चोरी करण्यात येते. ही रेती एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात तसेच इतर तालुक्यात नेल्या जात आहे.
एखाद्या वेळेस अधिकारी आले की रेती तस्कर पळ काढतात. किंवा एकमेकांसोबत संपर्क करून त्यांचे हात ओले करण्यात येतात. याचमुळे मार्गाची चांगलीच वाट लागल्यामुळे याकडे कुणी लक्ष्य द्यायला तयार नाहीत. आता याकडे लक्ष कुणी द्यावे? हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर समस्याकडे महसूल, पोलिस तसेच सार्वजानिक बांधकाम विभागांनी लक्ष द्यायला हवे, अशी स्थानिकांची मागणी आहे.
डांबरी मार्ग बनविण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करतो. खड्डे पडले की शासन पुन्हा खड्डे बुजविण्यासाठी लाख रुपये खर्च करतात. परंतु, या मार्गाची वाट लावणार्यांवर वचक का म्हणून बसत नाही? हा चिंतनाचा विषय आहे. प्रशाषन यावर काय कार्यवाही करणार हा प्रश्न आहे.