शेतीतून उतपन्न नाही व शिक्षण घेऊनही आरक्षणा अभावी नोकरी नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या एका मराठा युवकाने विष पिऊन तर, एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमित विकास सावळसुरे (वय, २२) आणि नवनाथ निवृत्ती माने (३५)अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. तळणी येथील सुमित सावळसुरे हा बीएससी डीएमएलटी झाला होता. मात्र, त्याला अनेक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नव्हती. वडिलांवर कर्जाचा बोजा होता. थोरला भाऊ बीएचएमएस असून त्याच्याही शिक्षणावर पैसा खर्च झाला होता. बहिणीच्या लग्नाचीही काळजी लागली होती. मोठे मोर्चे काढूनही सरकार आरक्षण देत नाही म्हणून त्याने बुधवारी सायंकाळी विष पिले होते. त्याला तातडीने किल्लारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सांयकाळी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सेलू येथील नवनाथ माने यांनी नापिकीने त्रस्त होऊन व आरक्षण मिळत नसल्याच्या कारणावरुन बाभळीच्या झाडास गळफास घेतला.