मराठी माणसाचा नोकिया होईल..!

0
1067
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)

नोकिया हा एकेकाळचा जगातील सर्वात मोठा मोबाईल ब्रॅंड. अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ अशी नोकियाची ख्याती होती, पण ना नोकियाच्या मॅनेजमेंटची काही चूक, ना कामगारांचा संप, ना कोणता अपघात, ना कोणत्याही सरकारची वा देशाची बंदी. हे जगातील पहिले व एकमेव उदाहरण असावे की, एखाद्या ब्रॅंडमध्ये कोणतीही चूक झाली नसताना तो विकावा लागला व शेवटी कंपनी बंद झाली.
शेवटचे शब्द
पत्रकार परिषदेत नोकियाच्या सीईओने कंपनी मायक्रोसॉफ्टला विकल्याचे जाहीर केले, तेव्हा नोकियाच्या सीईओचे शेवटचे शब्द होते, आम्ही कोणतीही चूक केली नाही, परंतु आम्ही हरलो त्या परिषदेत सीईओ, त्यांची मॅनेजमेंट टीम अक्षरक्ष: हंबरडा फोडून रडत होते. कोणतीही चूक केली नसताना जगभर प्रसिध्द असणारी एवढी मोठी कंपनी विकण्याची त्यांच्यावर नामुष्की आली होती.
काय झाले
नोकिया ही खूप चांगली कंपनी व ब्रॅंड, पण ज्या वेगाने मोबाईल क्षेत्र जगभर बदलत होते. चीन व इतर देशात नवीन ब्रॅंड उदयास येत होते, पण नोकिया नेहमीच्या आपल्या कौशल्यावर मोबाईल व तंत्रज्ञान घेवून काम चालवत होते. त्यामुळे जगामध्ये असणारी मोठी संधी व मार्केट त्यांना काबीज करता आले नाही, त्यामुळे इतर कंपन्यांनी बाजारपेठ खाऊन टाकली व शेवटी नोकिया संपला.
मराठी माणूस
मराठी माणूससुध्दा असाच सहिष्णू, साधा, आपल्या विचार व ज्ञानाने परंपरेप्रमाणे चालणारा आहे. तो कोणाचेही वाईट करत नाही. इमाने इतबारे नोकरी करतो. निसर्गाच्या लहरीप्रमाणे शेती करतो. जमेल तशी प्रामाणिकपणे विठ्ठलाची, शिवाजीची, गणपती, गुढीपाडवा यांची पूजा व उत्सव साजरे करतो. मराठी महिला निमुटपणे घरकाम करतात. मुलं असेल तशी शाळा, कॉलेज शिकून छोटी नोकरी करतात. जशी नोकियाने कोणतीही चूक केली नाही, तशी मराठी माणसानेही गेल्या ६० वर्षात चूक केली नाही. प्रत्येक निवडणुकीत नवा पक्ष, नवा उमेदवार यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून निवडून देतो.संपत चालला
हा चांगुलपणाच मराठी माणसाच्या अधोगतीला नडत असून, मराठी माणूस सहिष्णू व चांगुलपणाने राहतो, पण बाकीचे लोक व्यापार करू लागले तेव्हा मराठी माणूस नोकरी व चाकरी करत राहिला. महागाई वाढत चालली, घरात माणसं वाढली व नोकरीतला पैसा पुरेनासा झाला, मग शेवटी वडीलोपार्जित संपत्ती विकली. आलेले पैसेही काही दिवसात संपले. शेवटी मुंबईत राहणे परवडेना आणि मग मुंबईतले घर विकून बाहेर विरार, अंबरनाथ, कल्याण गाठले. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही शेतकऱ्यांच्या जमिनी सावकार, धनाढ्य राजकारणी, व्यापारांनी विकत घ्यायला सुरू केल्या आणि हळूहळू महाराष्ट्रातच मराठी माणूस हरला, कारण मराठी माणसाने व्यापार केला नाही, आक्रमक वागला नाही, तो सर्वांना सामावून घेत गेला, इमाने इतबारे नोकरी व चाकरी करत राहिला.
म्हणूनच मराठी माणूस लवकर जागा नाही झाला तर त्याचा नक्कीच नोकिया होईल.

शब्दांकन :- यामिनी लोहार

संकलन :- उत्तम गिते